*कळत नाही...कधी बदललं सगळं...*
@ रेणुका दर्शने
....आमचा फोडणीचा भात... इथे फ्राईड राईस...
आमच्या बटाट्याच्या काच-या... यांच्या फ्रेंच फ्राईज...
..आमचा शेवयाचा उपमा , यांच्या मॅगी नूडल्स...
आमची थालीपीठ भाकरी , यांचा पिझ्झा ..
..कधी राजहंस कधी पोळीचा लाडू..कधी तेल मीठ चुरमुरे..कधी घट्ट वरण चटणी...
परवापरवापर्यंत सगळं जिभेवर होतं....आता मेन्यू कार्डवरची ती इटालियन की जर्मन.. नावंही वाचताही येत नाहीत..
कळत नाही...
..कधी बदललं हे सगळं ...आता पोरांच्या जिभेवर या चवीच खेळत नाहीत...
...कुल्फी..गारेगारच्या गाड्याभोवती गराडा जमायचा...
...ती चिंचेची झाडं आता एकाकी वाटतात...त्या लगडलेल्या झाडांभोवती चिंचेचे आकडे पाडायला, कै-या पाडायला.. पोरं जमतच नाहीत... पहिल्यासारखी...चिंचेचे गोळे,बोरं जांभळं.. पोह्याचे पापड, शेंगदाणे फुटाणे.. साखरगोळ्या...या चवी कशामुळे दबल्या.. कळत नाही ..
मुरमु-याची जागा कुरकु-यांनी घेतली...गोळ्यांची जागा कॅडबरीने ...
कोबीचं पान सिझलरखाली दबलं...ढबू मिरची नूडलमध्ये शिरली...घेवड्याची शेंग 'बीन्स' नावानं प्रचलित झाली...
कळत नाही कधी बदललं सगळं...
..आम्ही गावी पोचल्यावर कार्ड लिहायचो "पोचलो" म्हणून ..पोचायचं आठ दिवसांनी...
आता स्टॅंडवर पोचेपर्यंतच शंभर फोन होतात...
कळत नाही, कधी बदललं सगळं...
पाच दिवसांची कसोटी आता ' टी -20 ' झाली..
पंधरा मिनिटांच्या ' आजच्या ठळक बातम्या ' आता २४ तासांची करमणूक झाली, आवंढा न गिळता आणि श्वासही न घेता त्या ब्रेकिंग न्यूजचा भडिमार.. ' विनोद ' हा 'विनोद ' न रहाता ' इनोद ' होऊन बसला. मागून हसण्याचे आवाज लावलेल्या विनोदी मालिका सोडून इतरच कार्यक्रम मात्र खळखळून हसवू लागले. लोक गडाबडा लोळू लागले...
पुलंचा ' विनोद ' आता राहिला नाही...
आठवड्यातून एकदा अर्धा तास दिसणारे मालिकांतले चेहरे आता रोज ' त्रिकाळ ' दर्शन देऊ लागले...
घरोघरी स्वयंपाकघरात होणा-या 'live' पाककृती ' यू ट्यूब ' वर जाऊन बसल्या ..
आठवड्यातून एकदा भेटणारे मिकी - डोनाल्ड आता ' कार्टून ' च्या रुपातून रात्रंदिवस थैमान घालू लागले...रोजचं दूध आता पिशवीतून येतं आणि रतीब घालतात त्या रोजच्या मालिका...डेली सोप्स या गोंडस नावाखाली...
'दूरदर्शन ' चं दर्शन बंद झालं..ती गोड धूनही ...
कौलारू शाळा ' इंटरनॅशनल ' झाल्या.गप्पा मारत चालत शाळेला जाणं आम्ही विसरून गेलो... मूल चार पोरांत ढकललं की ते आपोआप शाळेला जाऊ लागायचं...पुलंनी लिहिलंय...
११ ते ५ भरणा-या शाळासुद्धा कारखान्यांप्रमाणे शिफ्ट करू लागल्या. या कारखान्यांतून विद्यार्थी बाहेर न पडता, एखाद्या product प्रमाणे ' विकाऊ माल ' बाहेर पडू लागला...
... परीक्षा झाली की 'मामाचा गाव' खुणावायचा..मामाच्या गावाला नेणा-या 'एसट्या' आणि ' आगीनगाड्या ' आता राहिल्या नाहीत...
..चुली गेल्या ... चुलीची राखही online मिळते ... कंदील चिमण्या हद्दपार झाल्या..एवढंच काय टाॅर्चही बंद पडले...गजराची घड्याळं गेली.. कॅमे-यांत काढलेल्या फोटोंची प्रतीक्षा गेली... तो ' इंतजार का मझा ' आता राहिला नाही... एसटीडी बूथ गेले..पत्रपेट्या गेल्या..तारा गेल्या.. टीचभर मोबाईलनं आयुष्य व्यापलं... पोरांच्या हातातली विटीदांडू गेली...लगोरी गेल्या...गोट्याही गेल्या...
काऊचिऊ आता अंगणात येत नाहीत...घरांना अंगणं तरी कुठे उरलीत आता.. बाळाला घास भरवायला आईलाही समोर मोबाईलच लागतो...आजीच्या गोष्टी गेल्या ..अंगाई गेली...'मायेच्या गोधड्या' गेल्या...आज्या आता नऊवारी नेसत नाहीत...आजोबा धोतर नेसत नाहीत...एवढंच काय पोरांची लंगोट दुपटीही गेली...
...फॅशनच्या नावाखाली आता गोणपाटाचेही कपडे आले...फाटकं घालायचं नाही.. असा त दंडक होता...आता चिंध्या झालेल्या कपड्यांचीच फॅशन आली...
कळत नाही..कधी बदललं सगळं...
'बटाट्याच्या' चाळीसारख्या चाळी गेल्या..वाडे गेले...
दारांची कुलपं गेली, लॅच आले ..दाराला संशयाने बघणारी छिद्रं आली .. दिवसा सताड उघडी ...रात्री बंद होणारी दारं ..दिवसरात्र बंद झाली...कळत नाही माणसं अशी घरात कोंडून कधी पडली...
...*आईवडील आणि प्रेम सोडून आता सगळं online मिळतं...शेणाच्या गोव-या ते कार....सगळं सगळं....*
..आता केव्हाही कधीही ते झोमॅटो बिमॅटो आपलं पोट भरतं..
*पण ते सुखसमाधान कोप-यात कुठंतरी दडून बसतं...*
- रेणुका दर्शने, पुणे ( copyright)
.......... 🌹